दापोली : देशभरातील प्रादेशिक भाषा अर्थात त्या त्या ठिकाणच्या नागरिकांच्या मातृभाषा या विषयावर अभ्यास करण्यासाठी डोंबिवलीचे गंधार कुलकर्णी सायकलवरून भारतभ्रमणाला निघाले आहेत. या प्रवासादरम्यान नुकतेच ते रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत पोहोचले. त्या वेळी त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) जिल्हाध्यक्ष आणि निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. ‘कोमसाप’ आणि निवेदिता प्रतिष्ठानतर्फे गंधार कुलकर्णी यांचे भेटवस्तू आणि शुभेच्छापत्र देऊन स्वागत करण्यात आले. तसेच भारतभ्रमण यशस्वी होण्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.
मातृभाषांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यासाठी देशाच्या सर्व राज्यांत जाऊन अभ्यास करण्याचा या दौऱ्याचा उद्देश असल्याचे गंधार यांनी सांगितले. एक जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. आतापर्यंत ७९०० किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला असून, दहा राज्यांच्या भाषांचा अभ्यास केला आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, चंडीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात असा प्रवास करून ते आता महाराष्ट्रातून पुढे गोव्याकडे रवाना होणार आहेत. गुहागर येथील वेळणेश्वरला जाऊन तीन दिवस रत्नागिरीत थांबून नंतर पुढील प्रवासाला रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एकूण वीस हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करून ऑगस्ट २०१९पर्यंत भारतभ्रमण पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या दौऱ्यासाठी एसबीआय आणि पितांबरी यांनी थोडे सहकार्य केले असून, मंत्री विनोद तावडे यांनी शुभेच्छापत्र दिल्याचे गंधार यांनी सांगितले. आतापर्यंतच्या दहा राज्यांच्या प्रवासादरम्यान नोंदवलेल्या निरीक्षणांच्या आधारे त्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातच मातृभाषेबद्दल जास्त जागरूकता असल्याचे आढळून आल्याचे गंधार यांनी सांगितले.